प्रेक्षकांना भावतेय ‘सुपर डुपर’ची ‘अंगाई’.
झी स्टुडिओज ‘सुपर डुपर’ चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. चित्रपटाच्या कथानकाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादासोबतच चित्रपटातील गाण्यांनाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘सुपर डुपर’ या चित्रपटातील ‘अंगाई’ हे गाणे प्रदर्शित झाले असून यानिमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच वर्षांनंतर एक हळवे आणि मनाला भिडणारे अंगाई गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'निजूनी गेला दिस कधीचा.. चांद हा येता..पापण काठी तरली नीज.. थांबव चाळा.. ममता ओली, कुस उतावीळ.. नीज रे बाळा.. असे भावपूर्ण बोल असलेल्या या गाण्याला सध्या प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत असून, चित्रपटगृहात भावनिक वातावरण निर्माण करत आहे.
प्रसिद्ध गायक स्वानंद किरकिरे यांच्या भावपूर्ण आवाजात साकारलेल्या या गाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुणाल - करण यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला त्यांचेच संगीत लाभले आहे. हे अंगाई गीत आईच्या मायेचा, नात्यांमधील उबदारपणाचा आणि प्रेमाच्या नाजूक भावनांचा सुंदर आविष्कार सादर करते. चित्रपट पाहाताना अनेक प्रेक्षक या गाण्यादरम्यान भावूक होत असल्याचे दिसून येत आहे. प्रेक्षकांना भावणारे हे गाणे सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
चित्रपटातील अभिनेते शशांक शेंडे यांच्या प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच, कथानकात ‘अंगाई’ हे गाणे येताच वातावरण अधिकच भावनिक होते. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे पाहायला मिळत आहे.
दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, ‘’ हे अंगाई गीत माझ्यासाठी अत्यंत जवळचे आणि भावनिकदृष्ट्या खूप खास आहे. लहानपणी ऐकलेल्या अंगाई गीतांच्या आठवणी, आईची माया आणि त्या काळातील निरागसता या सगळ्या भावना या गाण्यातून पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण नात्यांमधील जिव्हाळा आणि शांतता कुठेतरी हरवून बसलो आहोत, तीच ऊब या गाण्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती. या गाण्याला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता खूप आनंद होतो.”
झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, ललित प्रभाकर, विदुला चौगुले, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. समीर आशा पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. तर संजय जाधव यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा