२० वर्षांनंतर पुन्हा एकदा 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ'.. मनोरंजनाचा नवा 'पॅटर्न'.
काही नाटकं ही केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर ती आयुष्याच्या एका कालखंडाची आणि जुन्या ऋणानुबंधांची साक्ष असतात. तब्बल २० वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' हे नाटक पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण यंदा या नाटकाच्या पडद्यामागे केवळ तांत्रिक तयारी नाही, तर भावनांची एक मोठी गुंफण आहे. रॉयल थिएटर आणि निर्माते मिहिर गवळी यांच्या या नव्या प्रयोगाचे दिग्दर्शक संतोष पवार यांनी या प्रवासातील काही अत्यंत हळवे पैलू उलगडले आहेत. अतुलच्या आठवणी आणि विनयची साथ हे नाटक पुन्हा सुरू करताना समोर उभं होतं ते २० वर्षांपूर्वीचं चित्र. तेव्हा या नाटकात विनोदाची अप्रतिम जाण असलेले अतुल परचुरे होते. आज अतुल आपल्यात नसला तरी, त्याची जागा घेण्यासाठी संतोष पवारांनी अशा एका व्यक्तीची निवड केली, जो अतुलचा केवळ सहकलाकार नव्हता, तर त्याचा शाळकरी मित्र होता - विनय येडेकर. संतोष पवार भावूक होत म्हणतात, "आम्हाला या भूमिकेसाठी असा कलाकार हवा होता, ज्याची स्वतःची एक स्वतंत्र शैली असेल आणि जो या पात्राला पूर्णपणे न्याय देईल. विनय आणि अतुल हे जिवलग मित्र. त्यामुळ...