अर्नाळ्यातील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न; मानवसेवेचा संदेश ठरला केंद्रस्थानी.
प्रभात कॉलनी, अर्नाळा येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला. अभिषेक, महापूजा, आरती, नामस्मरण, दर्शन तसेच ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सदानंदबुवा गोखले यांच्या प्रभावी कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला. त्यांनी आपल्या कीर्तनातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांचा, सदाचाराचा आणि मानवतेच्या संदेशाचा प्रभावी जागर केला. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीबरोबरच माणुसकी, करुणा आणि संवेदनशीलता जपणे हीच काळाची खरी गरज असल्याचा संदेश देण्यात आला. श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण सत्य, सेवा, प्राणीमात्रावरील प्रेम आणि मानवकल्याणाचा मार्ग दाखवणारी असल्याचेही सांगण्यात आले. स्थानिक परंपरेनुसार, सन १८०० च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजांनी अर्नाळा परिसरात वास्तव्य केले होते. त्याच दैवी प्रेरणेतून श्री विनायक गुळगुळे व सौ. नूतन गुळगुळे यांनी सन २०१५ मध्ये गजलक्ष्मी स्वरूप कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ शक्तीस्थानाची स्थापना केली. या शक्तीस्थानातील 'स्वानंद सेवा सदन' या उपक्रमाद्वारे ग्रामी...