महाभारतातील चिरंजीव 'अश्वत्थामा' रंगभूमीवर...
महाभारत ज्यांना माहित आहे किंवा महाभारत ज्यांनी वाचले आहे, त्यांना महाभारतातील 'अश्वत्थामा' या व्यक्तिरेखेविषयी मोठे आकर्षण आहे. त्याचे चिरंजीवित्व हा कायम औत्सुक्याचा विषय राहिला आहे. अश्वत्थामा कोण होता, त्याचा तो नीलमणी कसा होता, तो आजही तेल मागत फिरत असतो; असे अनेक प्रश्न त्याच्याभोवती फिरत असतात. त्याच्याशी संबंधित या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता रंगभूमीवर मिळत आहेत. कारण महाभारतातील हा अश्वत्थामा आता रंगमंचावर अवतरला आहे. ज्येष्ठ नाटककार, कादंबरीकर, दिग्दर्शक व अभिनेते अशोक समेळ यांच्या 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या महाकादंबरीवर आधारित याच नावाचे नाटक आता रंगभूमीवर आले आहे.
'ऋग्वेद' या नाट्यसंस्थेने 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले आहे. नाटकाचे प्रोजेक्टर नेपथ्य विश्वास पिंपळे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. नाटकाला संग्राम समेळ यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अशोक समेळ व धनश्री दामले या नाटकात भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे वयाच्या ८४ व्या वर्षी अशोक समेळ अश्वत्थाम्याची भूमिका रंगवत आहेत. या नाटकाचा अलीकडेच शुभारंभ झाला आणि हे नाटक सध्या रसिकांच्या पसंतीस पडत असल्याचे चित्र आहे. या नाटकाचा प्रयोग आता १८ मे रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणार आहे.
या नाटकाबद्दल अशोक समेळ म्हणतात, "महाभारतातील 'अश्वत्थामा' या व्यक्तिरेखेबद्दल वाचक व रसिकांमध्ये विलक्षण कुतूहल आहे. हा महापराक्रमी, महापंडित, द्रोणपुत्र अश्वत्थामा असा का झाला; या विषयावर मी गेली २५ वर्षे सखोल अभ्यास आणि संशोधन केले आहे. माझी ही महाकादंबरी २०१५ या वर्षी आली आणि तिच्या ९ आवृत्त्या निघाल्या. यावर नाटक यावे, असा अनेकांचा आग्रह होता; त्यामुळे आता मी त्यावर नाटक लिहिले आहे. कादंबरीप्रमाणेच हे नाटकही लोकांना आवडेल याची मला खात्री आहे".
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा