‘तुंबाडची मंजुळा’मधील ‘देवा मला पाव की रे’ हे गाणं प्रदर्शित
झी स्टुडिओजच्या बहुचर्चित ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. रहस्य, थरार आणि वेगळ्या कथानकामुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटातील आता आणखी एक खास आणि मनाला भिडणारं गाणं ‘देवा मला पाव की रे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं भावविश्वाला स्पर्श करत थेट मनात घर करणारं आहे. सई ताम्हणकरवर चित्रित या गाण्यात ईश्वराकडे मनापासून केलेली प्रार्थना, संकटाच्या काळात देवाकडे धाव घेणाऱ्या मनाची आर्त हाक आणि श्रद्धेची भावनिक गुंफण या गाण्यातून अनुभवायला मिळते. कधी आयुष्यातील संकटं, कधी असहायता तर कधी मनातील वेदना अशा अनेक भावनांनी भरलेल्या क्षणी मन देवाकडे धाव घेतं. हीच भावना या गाण्यात सुंदरपणे मांडण्यात आली आहे. गाण्याचे शब्द, सूर आणि गायन या तिन्ही माध्यमांतून सायली खरे यांनी या गाण्याला एक वेगळीच आत्मीयता दिली आहे. ‘देवा मला पाव की रे’ या गाण्याची गीतकार, संगीतकार व गायन अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. या गीतातील भावनांचा गहिरा प्रवास आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करते. हे गाणं मनातील भावना आणि देवाशी संवाद साधणारी एक प्रार्थना म्हणून समोर येतं.
गायिका सायली खरे म्हणतात, "१३ वर्षापूर्वी एका प्रोजेक्ट निमित्त या गाण्याचं पहिलं रेकॉर्डिंग झालं, तेव्हा विविध कोरगावकरने ते ऐकलं होतं. त्यावेळी त्याने मला शब्द दिला की, 'मी जेव्हा माझा पहिला चित्रपट दिग्दर्शित करेन, तेव्हा त्यात हे गाणं नक्की असेल.' मीही त्याला लगेच होकार दिला. यानंतरच्या काळात मी अनेक चित्रपट आणि संहितांवर काम केलं. बऱ्याचदा हे गाणं इतर प्रोजेक्ट्ससाठी पाठवूनही काही ना काही कारणाने ते तिथे फिट बसलं नाही. पण कदाचित परमेश्वराला विविधने दिलेला तो शब्द पूर्ण करायचा होता, म्हणूनच अखेर या चित्रपटाच्या माध्यमातून हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं. त्यानंतर या प्रक्रियेत बवेश सर आले, त्यांनी गाण्याला आणखी अचूक दिशा दिली."
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, “देवा मला पाव की रे या अत्यंत संवेदनशील अशा गाण्यासाठी आम्हाला एक असा आवाज हवा होता ज्याद्वारे या गाण्याचा प्रत्येक शब्द आणि त्यातील भावना प्रेक्षकांपर्यंत अचूकपणे पोहचेल. यासाठी सायली खरे यांचा आवाज अतिशय योग्य असाच होता. त्यांच्या आवाजात असलेला ‘ठहराव’ ही या गाण्याची गरज होती. या चित्रपटाची एक संवेदनशील बाजू या गाण्यातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. हे गाणं प्रत्येक रसिक प्रेक्षकाला आवडेल असा विश्वास आहे.”
दिग्दर्शक विविध कोरगांवकर म्हणतात, ”‘देवा मला पाव की रे’ हे गाणं चित्रपटातील पात्रांच्या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा शब्द संपतात आणि मन देवाशी बोलू लागतं. त्या भावनेला पडद्यावर आणि संगीतामध्ये प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न आम्ही या गाण्यातून केला आहे ”
५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट रहस्य, विनोद आणि भन्नाट कथानकाचा अनोखा संगम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केलं असून कथा आणि लेखनाची जबाबदारी ऋषिकेश तुरई यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे. वेगळ्या कथानकासोबतच चित्रपटातील कलाकारांची दमदार फळी हे देखील या चित्रपटाचं खास आकर्षण ठरणार आहे. जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांसारखे कलाकार आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एक वेगळीच रंगत आणताना दिसणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा