गौतमी पाटीलचा 'लागला ठसका ४४०चा झटका...''लाईव्ह'मध्ये लावणीचा तडका असलेले, आधुनिक आयटम गीत...
मराठी चित्रपटांमध्ये गीत-संगीताचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे सुरेल गीत-संगीताची किनार असलेले मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. 'लाईव्ह' या आगामी मराठी चित्रपटालाही श्रवणीय गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून मराठीतही आयटम साँगचा ट्रेंड रुजला असून, 'लाईव्ह'मध्ये एक वेगळ्या धाटणीचे आयटम साँग पाहायला मिळणार आहे. शीर्षकावरून या चित्रपटात काय पाहायला मिळेल याचा थांगपत्ता लागत नसल्याने 'लाईव्ह'बाबत कुतूहल वाढले आहे. अशातच या चित्रपटाला नृत्यांगना गौतमी पाटीलच्या ठसकेबाज गाण्याचा तडका देण्यात आल्याने 'लाईव्ह'ची जोरदार चर्चा रंगणार आहे. निर्माते सुमित पांडे रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली 'लाईव्ह' चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. छबी असीम हल्दर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून, संजीव राय लेखक-दिग्दर्शक आहेत. काही दिवसांपूर्वीच 'लाईव्ह'च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. नुकतेच 'लाईव्ह'मधील एका महत्त्वाच्या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. हे गाणे म्हणजे लावणीचा तडका असलेले नव्या धाटणीचे आधुनिक आयटम गीत आहे. गोरेगाव येथील फीचर स्टुडिओमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. या गाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले. 'लागला ठसका ४४०चा झटका...' असे गीतकार अश्पाक एफएच शेख यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे गायिका खुशबू जैन यांनी गायले असून, संगीतकार अमन श्लोक यांनी संगीतबद्ध केले आहे.
या चित्रपटातील न्याय-हक्कासाठी नायिकेने केलेल्या संघर्षाची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावी अशी आहे. या कथेच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, समाजातील विविध घटनांचा वेध घेण्यात येणार आहे. गौतमी पाटीलवर चित्रीत करण्यात येत असलेल्या गाण्याबाबत दिग्दर्शक संजीव राय म्हणाले की, समाजातील वास्तव चित्र दाखवणाऱ्या 'लाईव्ह' चित्रपटाच्या कथेत 'लागला ठसका ४४०चा झटका...' हे गाणे केवळ आयटम साँग असायला हवे म्हणून घेतलेले नाही. हे गाणे असावे ही कथेची गरज आहे. हे गाणे कथेच्या प्रवाहाशी एकरूप होऊन एका नाट्यमय वळणावर येणारे आहे. या महत्त्वाच्या गाण्यासाठी गौतमी पाटीलसारख्या आजच्या काळातील आघाडीच्या नृत्यांगनेची निवड करण्यात आली. गौतमीने आपल्या नृत्याने या गाण्यात रंगत आणली असल्याचेही ते म्हणाले.
दिग्दर्शक संजीव राय यांनी पूनम विभूते यांनी संवाद लेखन केलेल्या या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकार विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार आहेत. डिओपी गोपी सिनेमॅटोग्राफी करीत असून, सैफुद्दीन शेख या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत. गीतकार अश्पाक एफएच शेख यांच्याखेरीज गीतकार महालिंग कंठाळे यांनीही गीतलेखन केले असून, संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक यांनी चित्रपटातील गीतांना संगीत दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा